पुणे : बंगळूरू येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका कृषीविषयक समारंभात पुण्यातील ‘मायग्रो इंडिया’ या कृषी मार्गदर्शक संस्थेला ‘इंडस्ट्रियल एक्सलन्स २०१८’ या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
‘भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि इथला शेतकरी सक्षम आणि सधन असलाच पाहिजे’, अशी प्रतिक्रीया ‘मायग्रो इंडिया’चे संस्थापक स्वप्नील टोपरे यांनी सन्मान स्वीकारताना व्यक्त केली. मायग्रो इंडिया उद्योगसमूह सेंद्रिय, जैविक आणि नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये नावीन्यपूर्ण औषधनिर्मिती, बायोडायनॅमिक पद्धतीचा सोपा व सहजरीत्या वापर या विषयांवर सातत्याने कार्यरत आहे, अशी माहितीही टोपरे आणि श्रीजित पनीकर यांनी दिली.
संस्थेचे स्वप्नील टोपरे आणि श्रीजित पनीकर यांच्या नावे जैविक शेती तंत्रज्ञान या विषयावर अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन प्रबंध आहेत. मराठवाड्यातील अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना संस्थेतर्फे विनामूल्य शेतीपूरक औषधांचे वापटही केले जाते. तसेच सर्व शेतकरी मित्रांना व होतकरू तरुणांना विनामूल्य मार्गदर्शनही केले जाते. ‘इंडस्ट्रियल एक्सलन्स’ या पारितोषिकाबद्दल संस्थेचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.